गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

  परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी प्रेम हा मार्ग आहे."

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - १, श्लोक - २८-३०

 
        हे कृष्णा या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या आप्तस्वकीयांना पाहून माझी गात्रे शिथिल झाली आहेत. घशाला कोरड पडली आहे. सर्वांगाला कंप सुटला आहे. शरीर रोमांचित होत आहे. माझ्या हातातून गांडीव धनुष्य गळून पडले आहे. त्वचेचा दाह होत आहे. येथे उभे राहण्यास मी निः शक्त आहे. माझे मन चक्रावून गेले आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
            हे कान्हा, प्रभू, मला निर्भय बनव आणि आसरा दे. मला अनाठायी चिंता लागून राहिली आहे. देहाला कंप सुटतो आहे. घशाला कोरड पडते आहे. अंगावर शहारे येत आहेत. आदिनारायणा, मला आपले बनव. हे पांडुरंगा, भक्तरक्षका, तुझा सच्चा भक्त बनव. परमदयाळा, क्षीरसागरशयना! कान्हा! तूच माझे आश्रयस्थान आहेस.
           कान्हा! प्रभू! या दुबळ्याचा बेडा पार कर. या अगतिकाची तूच गती. तुझ्या चरणी घेऊन तूच कल्याण कर. त्राता, धर्मस्वरूपा, अश्वत्थपत्रवासा, आदिअंतररहित ईसा! तूच माझा आधार.
           कान्हा, भयातीता, यालाही तू भयातीत कर हातातून गांडीव निसटू देऊ नकोस. शारीरिक ताप निर्माण करू नकोस. स्थिरमती  कर. मनास गोते खाऊ देऊ नकोस. मधाच्या धारेप्रमाणे संतत, अखंड, स्थिर, अविचल, अचंचल, फक्त तुझा विचार येईल असं कर. श्रीनिवासा! जगदिशा! ईसा परिपूर्णा, पुरुषोत्तमा ! तूच फक्त आधार.
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा