रविवार, २९ ऑक्टोबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " मृत्यू समयी मनात असणारे प्रबळ विचार पुढील जन्माचा पाय रचतात. "

प्रकरण अकरा

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम

२८ एप्रिल २००३ 
               स्वामी म्हणाले, " इथे राधेचे प्रेम सर्वव्याप्त आहे. सर्वत्र राधाकृष्णाचे प्रेम आहे. लोक, भूतल, झाडेझुडपे, फुले, पाने सर्वकाही प्रेमाने ओथंबले आहे. आचार, विचार, उच्चारांमधून प्रेमाची जाणीव होते व प्रेम व्यक्त होते. वृंदावनला भेट देणाऱ्या कोणालाही या स्थानामध्ये भरून राहिलेल्या दिव्य प्रेमाची अनुभूती येईल. राधा कृष्णाचा आत्मा आहे ह्याची त्यांना जाणीव होईल. हेच आहे आत्मदर्शन ! तुझ्याबरोबर आलेल्या भक्तांना हे आत्मदर्शन झाले. हे आहे राधाकृष्ण तत्वाचे ज्ञान, प्रेमाच्या सत्याची जाणीव. " 
              राधेचे प्रेम एखाद्या तटबंदीप्रमाणे वृंदावनचे रक्षण करत आहे. 
              तेच राधा कृष्ण वेगळ्या रूपात वेगळ्या ठिकाणी पुन्हा जन्मले आहेत. परंतु या जन्मात ते एकमेकांपासून दूर आहेत. त्यांच्या प्रेमाने संपूर्ण जगत भरून राहिले आहे. हे जगच वृंदावन बनले आहे. ही सत्य युग पृथ्वी आहे. 
प्रियतम स्वामी, 
तुम्ही सांगितले 
- " लिही " - मी लिहिले 
- " मला सामील हो." - सामील झाले 
- " सर्वसंगपरित्याग कर." -  मी केला 
- " माझ्या अवतारकार्यात मला सहाय्य कर." - सहाय्य केले. 
- " आश्रमाची जबाबदारी स्वीकार " - तुमच्यावर असलेल्या अनिर्बंध प्रेमापोटी मी जबाबदारीही स्वीकारेन. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

" परमेश्वराशी तादात्म्य पावलेले मन परमेश्वरच होऊन जाते."

प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम 

२७ एप्रिल २००३
                 आजचा दिवस माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा सुवर्णदिन ! मी सकाळी लवकरच स्नान केले आणि स्वामींनी सुचवलेली गुलाबी रंगाची साडी नेसले.
ध्यान पहाटे ४ वाजता 
दिव्य दृश्य
                  मी स्वर्गलोकामध्ये होते. स्त्रियांनी मला रत्नालंकार व बांगड्या घालून सजवले. माझ्या हातावर मेंदी काढली. पार्वतीने मला हार घातला आणि सभागृहाकडे नेले. नवरा मुलगा भगवान श्रीकृष्ण माझ्यासमोर बसले. ब्रम्हदेव स्वतः यज्ञविधी करत होते. मी राधेच्या देहात होते आणि माझे भाव वसंताचे होते . विवाहविधी पार पडले. होमाग्नीमधून अग्निदेवांनी मंगळसूत्र आणून एका तबकमध्ये ठेवले, ते सर्वांना दाखवून त्यांचे आशीर्वादही घेतले. ब्रम्हदेवाने ते तबक हातात घेतले व वेदिक मंत्रांचे उच्चारण केले.  वसुदेव, देवकी तसेच राधेचे मातापिताही या सोहळ्यास उपस्थित होते. कन्यादानाचा विधी झाला. श्रीकृष्णाने राधेच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. वधूवरांनी एकमेकांना हार घालून पवित्र अग्नीभोवती फेरे घेतले. ब्रम्हदेव म्हणाले, " द्वापारयुगामध्ये त्यांचा विवाह झाला नाही. आता ऋषी, मुनी, संत, देवगण यांच्या समक्ष हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. भूतलावरील लोकांसह जे कोणी इथे हजर आहेत ते या विवाहाचे साक्षीदार आहेत. श्रीकृष्ण हा सर्वांमधील आत्मा आहे व राधा कृष्णाचा आत्मा आहे.

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

सोमवार, २३ ऑक्टोबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

परमपूज्य श्री वसंतसाई अम्मा यांच्या ७९ व्या जन्म दिनानिमित्त 

आपला जन्म कसा झाला हे महत्वाचे नसून आपला मृत्यू कसा होणार हे महत्वाचे आहे. 
              आपला जन्म कसा झाला, आपण कोणाच्या पोटी जन्म घेतला, कोठे जन्म घेतला हे महत्वाचे नसून आपला मृत्यू कसा होणार हे महत्वाचे आहे. तुम्ही एखादा लक्षाधीश म्हणून जन्म घेतला वा भिक्षाधीश म्हणून जन्म घेतला ह्याला महत्व नाही. आपण जन्म का घेतला, आपल्या जन्म घेण्यामागचे ध्येय, उद्देश काय आहे हे जाणणे सर्वात महत्वाचे आहे. हे जाणल्यानंतर जीवाला अजन्मा अवस्था प्राप्त होते. पुन्हा जन्म न घेण्यासाठी सर्वांनी जन्म घेतला आहे. परमेश्वराने भूतलावर अवतरून ८४ वर्षे मनुष्याला शिकवण दिली. आपण हा देह नसून आत्मा आहोत हे त्याने सांगितले तसेच जीवनाचा उद्देश काय आहे हेही त्याने आपल्याला सांगितले. परमेश्वर परमात्मा आहे आणि इतर सर्व जीवात्मे आहेत. परमेश्वर परमदेही आणि आपण जीवदेही असे आपण म्हणत नाही. आपणही परमात्मा आणि जीवात्मा ह्या संज्ञानचा वापर करतो तर मग मी देह आहे असा विचार कशासाठी ? ह्या देहाविषयी केवढी आसक्ती आहे !
                  पुन्हा जन्म न घेण्यासाठी आपल्याला हे जीवन प्रदान करण्यात आले आहे . आणि म्हणूनच आपला मृत्यू कसा व्हावा हे महत्वाचे ठरते . आपला मृत्यूच आपल्या पुढील जन्माचे बीज बनते . योग्य तऱ्हेने मृत्यू आल्यास आपली जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होऊ शकते हे शिकवण्यासाठी भगवान श्री सत्य साई भूतलावर अवतरले परंतु जीवन कसे जगावे ह्यामध्येच मनुष्य व्यस्त आहे . त्याला केवळ हा एकच उद्देश आहे उद्या मी काय करू ? पैसे कसा मिळवू ? अधिक पैसा मिळवण्यासाठी मी काय करू ? हा मिळवलेला सर्व पैसे क्षणभंगुर गोष्टींवर खर्च केला जातो, ज्या गोष्टी तुम्ही जग सोडताना बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. जीवन कसे जगावे हा विचार सोडा आणि मृत्यू कसा व्हावा ह्यावर चिंतन करा.  हेच महत्वाचे आहे इतर कोणत्याही अवताराने भूतलावर येऊन स्वामींसारखी शिकवण दिली होती का ? त्यांनी सतत ८४ वर्षे कसे जगावे, कसे मरावे आणि जीवनाचा उद्देश काय ही शिकवण दिली. त्यांच्या शिकवणीतल एक दोन शिकवणीचे जरी तुम्ही आचरण केलेत तरी तुमची जीवनमृत्युच्या चक्रातून सुटका होण्यासाठी ते पुरेसे आहे. 
वसंत साई

जय साईराम

रविवार, २२ ऑक्टोबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

          " जीवनामध्ये कितीही दुःख, क्लेश वा अडचणी आल्या तरी प्रभूचरण धरून ठेवणे हे जीवनाचे एकमेव ध्येय असायला हवे. " 

प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम 

२६ एप्रिल २००३
               सकाळी आम्ही दिल्लीहून मथुरा वृंदावनला जायला निघालो. मुक्ती निलयमचे सर्वजण येऊन आम्हाला सामील झाले. संध्याकाळी आम्ही बाँके बिहारी मंदिरात गेलो. 
                त्या मंदिराच्या अरुंद गल्लीतून जात असताना माझ्या मनात विचार घोळत होते,' स्वामी मला इथं का बरं घेऊन आले आहेत ? ते काय करणार आहेत ? ' तेवढ्यात अचानक बाजूच्या छोट्याश्या गल्लीतून एक लग्नाची वरात आमच्या समोर आली. बँड वाजत होता. त्याच्यामागे नटून थटून आलेल्या लोकांचा एक घोळका हातामध्ये रंगीबेरंगी छत्र्या घेऊन नृत्य करत होता. त्यांच्या आनंदमय गीतांचे आवाज आमच्या कानावर पडले. " हे प्रिय राधे, कृष्ण तुला बोलावतो आहे." वधूवर मात्र कुठे दिसत नव्हते. आम्हीही आनंदाने त्यांच्या मागोमाग गेलो. मंदिरासमोरच पोहोचलो आणि काय आश्चर्य ! हे मंदिर आहे का लग्नमंडप ? 
                प्रत्येक प्रवेशद्वाराच्या खांबांना केळीची पाने बांधण्यात आली होती. प्रत्येक दारावर आंब्याची डहाळी लावण्यात आली होती. विविधरंगी सुवासिक पुष्पमालांचा सुगंध आसमंतात भरून राहिला होता. 
                 लग्नाच्या आदल्या दिवशी जसे संध्याकाळी वधूला कार्यालययात घेऊन येतात, अगदी तेच दृश्य होते. मला वाटले : लहानपणापासून उराशी बाळगलेले, परमेश्वराशी लग्न करण्याचे स्वप्न आता सत्यात उतरते आहे. माझ्या हृदयाचे गुपित या  मंदिरामध्ये सर्वांना  नाट्यरूपात पहायला मिळणार आहे.
                 माझ्याबरोबर आलेल्या सर्व भक्तांना नवल वाटले. मंदिराच्या आतील दृश्य पाहून तर आम्ही भारावून गेलो. असंख्य पुष्पमालांनी सुशोभित केलेला मंदिराचा अंतर्भाग विविध रंगांनी झगमगत होता. जिकडे पहावे तिकडे फुलेच फुले ! मंदिराचे पुजारी सर्वांच्या अंगावर तीर्थ शिंपडत होते. विवाहाची किती सुंदर तयारी !

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १९ ऑक्टोबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

           " एखादी गोष्ट अनुभवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. हा जगाचा कायदा आहे. "

प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम 

२५ एप्रिल २००३ सकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी, तुम्ही मला मथुरा वृंदावनला कशासाठी जायला सांगत आहात ? असे काय विशेष आहे ?
स्वामी - तिथे राधा -कृष्ण विवाह होणार आहे. 
वसंता - स्वामी, तुम्ही हे मला बऱ्याच वेळा सांगितले आहे. 
स्वामी - वसिष्ठ गुहेमध्ये तू माझ्याशी संयुक्त झालीस. तुझ्या कठोर साधनेचे फळ म्हणून तुला अतिउच्च अवस्था प्राप्त झाली. तू तुझे मन, बुद्धी, इंद्रिये , चित्त आणि अहंकार शुद्ध करून सर्वकाही मला अर्पण केलेस. परंतु तुझा हा देह राहिला, तोही शुद्ध करून मला अर्पण करण्याची तुझी इच्छा आहे. तू त्यासाठी साधना केलीस. आता तुझा देह समर्पणासाठी शुद्ध झाला आहे. याबद्दल तुझी खात्री झालीय. म्हणूनच वृंदावनला जाऊन तू तुझा देह मला अर्पण करणार आहेस. हा विवाह आहे, विशेष विवाह, तू ये, सर्व तुझ्या प्रतिक्षेत आहेत. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " तेलाच्या संततधारेप्रमाणे आपण अखंड परमेश्वराचे चिंतन केले पाहिजे. " 

प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम 

                 इथेच, याक्षणी मुक्ती भाग -२ या पुस्तकावर स्वामींची स्वाक्षरी घेण्यासाठी मी पुट्टपर्तीला गेले असताना तेथील एका उच्च पदाधिकाऱ्यांनी मला सांगितले. " तुम्ही प्रशांतीमध्ये येऊ नका." माझ्या अश्रूंना अंत नव्हता.  स्वामींनी माझी समजूत घातली. ते म्हणाले," तुझ्या इतमामाला शोभेल अशा मानसन्मानात तू पुट्टपर्तीला येशील. " मी म्हणाले," स्वामी, प्रत्यक्ष तुम्ही मला बोलवा, अन्यथा मी येणार नाही." त्यानंतर मी स्वामींच्या दर्शनासाठी कोडाईकॅनाल आणि वृंदावन येथे गेले. त्याठिकाणी स्वामींनी माझ्या पुस्तकांना आणि काही महत्वाच्या फोटोंना आशीर्वाद दिले. 
                 त्यांनतर स्वामींनी मला एका दूताकरवी बोलावणे पाठवले . तो माझा शोध घेत मुक्ती निलयम येथे आला आणि म्हणाला," या शिवरात्रीला तुम्ही पुट्टपर्तीला या. " त्यानंतर स्वामींनी ध्यानातही मला तेच सांगितले. पुट्टपर्तीच्या पवित्र भूमीवर स्वामींचे दर्शन घेता येणार या कल्पनेने झालेल्या आनंदापुढे माझ्या सर्व चिंता विरून गेल्या. आम्ही शिवरात्रीसाठी तेथे आलो आणि काही दिवस मुक्काम केला. त्यानंतर स्वामींनी मला सांगितले," तू मथुरा वृंदावनला जा. तेथे आपला राधा - कृष्ण विवाह होणार आहे." 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 
 
        " इतरांमधील दोष शोधू नका, स्वतःमध्ये असणारे दोष शोधून काढा. "

प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम 

९ फेब्रुवारी २००३ 
                ध्यानात स्वामींनी मला विचारले ," तू अशी सारखी रडतेस का ? तू माझा तरुणपणीचा फोटो आणि तुझ्या विवाहाचा फोटो या दोन्हीची तुलना करून पहा." माझ्या लग्नानंतर आमचा एक फोटो काढला होता. आम्ही स्वामींचा १९४४ सालामधील फोटो व माझ्या पतींचा विवाहातील फोटो, या दोन्हीची तुलना केली. दोघांच्या चेहऱ्यावरील साम्य पाहून आम्ही थक्कच झालो. जणू काही एका साच्यातून काढलेले दोन चेहरे. हे सत्य आहे का स्वप्न ? हे असे कसे काय ? पुन्हा पुन्हा आम्ही त्या फोटोंची तुलना करत होतो. ध्यानामध्ये स्वामींना मी याविषयी विचारले. ते म्हणाले," त्या रूपामध्ये माझे दिव्यत्व होते. तुला कोणीही स्पर्श करू शकत नाही. तू अग्नी आहेस, तू शुद्ध आहेस." 
                  आता शेवटची गाठही सुटली. माझ्या पहिल्या पुस्तकात स्वामी म्हणाले," तू माझी शक्ती आहेस " त्यांनतर त्यांनी मॉडर्न पार्वतीच्या फोटोद्वारे १२ व्या वर्षी मी कोण होते हे दाखवले. आता त्यांनी मला त्यांचा फोटो आणि मी विवाहबद्ध झालेल्या व्यक्तीचा फोटो त्यांची तुलना करण्यास सांगितले .शेवटचे कोडेही सुटले. स्वामी म्हणाले," तू जे काही करतेस त्यामध्ये धर्म प्रवेश करतो." माझ्या विवाहाच्या फोटोमध्ये धर्माने प्रवेश करून हे सिद्ध केले की ते सत्य आहे. 

असतो मा सद्गमय 
तमसो मा ज्योतिर्गमय 
मृत्योर्मा अमृतम् गमय 

                 हे परमेश्वरा, मला असत्याकडून सत्याकडे, अंधःकाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमृतत्वाकडे घेऊन जा. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम