रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " आपले अस्तित्व म्हणजे जीवनभराचे एक स्वप्न आहे हे आपण जाणले पाहिजे. "
 
विशेष कृपा 

           एकदा स्वामींनी त्यांचे भक्त वॉल्टर यांना जीवनदान दिले. हे विशेष कृपेचे उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. ही प्रेरक चैत्यन्यशक्ती परमेश्वराला कार्य करण्यास उद्युक्त करून विशेष कृपेचा वर्षाव करते. दुसरे उदाहरण कृष्णावतारात कुब्जेने कंसाच चंदन कृष्णाला दिले. कृष्णाने तिच्यावर कृपावर्षाव करून तिचे शरीर आमूलाग्र बदलले. क्षणार्धात कुब्जा एक सुंदर स्त्री झाली. तिने श्रीकृष्णाचे दिव्यत्व जाणले होते. तिने कुठलीही भिती न बाळगता कृष्णाला कंसाच चंदन दिले, म्हणूनच कृष्णानी कुब्जेच तीन ठिकाणी वक्र असलेलं शरीर सरळ करून तिच सौंदर्य तिला बहाल केल. क्षणार्धात तिची सर्व कर्म धुतली गेली. स्पंदशक्तीने कृष्णाला हे करण्यास आतून उद्युक्त केले. 
           प्रत्येक अवतार मानवतेवर करुणा आणि कृपेचा वर्षाव करीत असतो. या करुणेमुळे तर अवतार पृथ्वीवर अवतरतात. सहसा हे अवतार साक्षीअवस्थेत असतात आणि कधीकधी दिव्य  कृपावस्थेतून ते मानवांची कर्म धुवून टाकतात.    
   
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
     " देह सोडताना आत्मा त्याच्या कर्माचे ओझे वाहतो आणि पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतो. "
विशेष कृपा 

          एक उदाहरण, अनेक वर्षांपूर्वी, स्वामी त्रिचीला मोठ्या जनसमुदायासमोर प्रवचन देत होते. त्यावेळेस त्यांनी त्या गर्दीतून एका आंधळ्या मुलाला बोलावले आणि त्याला दृष्टी दिली. सर्व अचंबित झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी रहात होते त्या घरासमोर आंधळ्यांची बरीच गर्दी जमली. आदल्या दिवशी स्वामींनी एका मुलाला दृष्टी दिली  म्हणून सर्वजण दृष्टी मिळवण्यासाठी जमा झाले ! परंतु स्वामी मागील दरवाजाने बिल्डिंगमधून बाहेर पडून निघून गेले. ही घटना स्वामींची त्या मुलावर विशेष कृपा झाल्याचे दर्शवते. 
          स्वामी कर्मकायद्यात हस्तक्षेप करीत नाहीत. सर्वांनी आपापली कर्म भोगली पाहिजेत. स्पंदशक्ती साक्षी अवस्थेत असलेल्या परमेश्वरास कृपावर्षाव करण्यास उद्युक्त करते. अवताररूप परमेश्वर करुणा वर्षवतो. त्याच कारुण्यामुळे स्पंदशक्ती काही जणांना विशेष कृपेचा प्रसाद देते. प्रत्येक अवताराच्या काळात फार थोड्या भाग्यवंतांना हा विशेष कृपेचा लाभ मिळतो. हे आहे परमेश्वराचे सर्वज्ञत्व. दयेपोटी परमेश्वर अवतरित होतो परंतु विशेष कृपा हे त्याच्या चित् शक्तीचे कार्य आहे, हा फरक आहे.  
 
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 
उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम 

रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" सत्य ईश्वर आहे. सत्यवचनाने परमेश्वर प्राप्ती होऊ शकते."  
 
विशेष कृपा 

            स्पंद, परमेश्वराची प्रेरक चैतन्यशक्ती त्याला त्याला हलवून जागवते. त्यानंतर तेजोगोल बाहेर पडून अवताररूप धारण करतो. 
            परमेश्वर हा करुणेच मूर्तिमंत स्वरूप आहे. स्पंदशक्ती म्हणजेच करुणा. जेव्हा जेव्हा अनाचार वाढतो आणि धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा ही कारुण्यशक्ती परमेश्वराला हलवते. 'अवतरित होण्याची वेळ आली' हे ती परमेश्वराच्या निदर्शनास आणून देते. याच कारणामुळे तेजोगोल पृथ्वीवर अवताररूपात येतो. जरी तो करुणेचे मूर्तिमंत स्वरूप आहे तरी तो साक्षी अवस्थेत असतो. तो अवतारकार्यासाठी आणि धर्मस्थापनेसाठी आला आहे. तो कर्मकायद्यात हस्तक्षेप करीत नाही. तरीसुद्धा कधी कधी त्याचा कोणाकोणावर कृपावर्षाव होतो, आणि त्यांची कर्म धुतली जातात. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकार पुढील भागात ..... 
जय साईराम 

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प - ४६

जन्मदिन संदेश 

साई अमृत 


साई अमृत सर्वाना अमरत्व बहाल करेल: 
           अथक साधना करून आपणापैकी प्रत्येक जण कुंडलिनीचा सात चक्रे पार करू शकतो. आपले शेवटचे चक्र सहस्रार उघडले की आपल्यालाही भगवंताच्या मांडीवर बसण्याचं भाग्य लाभते. आपल्याला अमरत्व प्राप्त होते. भगवान नावाचे अमृत आपण मिळवले की आपण जीवन्मुक्त अवस्था प्राप्त करतो. आपण मृत्यूवर विजय मिळवू शकतो. भगवंत रुपी अमृताचं प्राशन करण्यासाठी सर्वांनी साधना करायलाच हवी. हा साई अवतार आपण सर्वांना त्याच्या अमृताद्वारे मुक्ती प्रदान करण्याकरिताच अवतरला आहे. आपण ह्या अवताराचा उपयोग आपल्यासाठी करून घ्यायला नको का? अमृत सागर अशा साईंकडे मी सर्वांना मुक्ती मिळावी म्हणून रोज प्रार्थना करत असते. 
            स्वामींनी मला ध्यानात सांगितलं, "आत्मा जेव्हा सहस्रारात पोहोचतो तेव्हा अमृताचे थेंब ठिबकू लागतात. ते अमृत प्यायल्यानंतर साधकाची क्षुधा आणि तृष्णा ह्या भावना नष्ट होतात. म्हणून मी तुझ्यावर अमृताचा वर्षाव केला आणि तुझं रूपच अमृत झालं." महान साधू व संन्यासी जेव्हा महिनोंमहिने ध्यानात राहत असत तेव्हा ह्या अमृतामुळेच ते टिकाव धरू शकत असत. त्यांना भूक आणि तहान यांची भावनाच होत नसे. अमृताच्या काही थेंबांचा जर एवढा प्रभाव असेल तर जरा कल्पना करून पहा, अवघे शरीर अमृताने भरलेली अवस्था कशी असेल ?भगवान म्हणालेत," तू ह्या अवस्थेत असल्यामुळे तू अखिल जगत अमृतत्वात परिवर्तित करू शकतेस." माझं अस्तित्वच अमृतमय कसं बरं झालं ? मी क्षण नं क्षण भगवत चिंतनात असते. म्हणून भगवंत चैतन्य अमृत होऊन माझ्या संपूर्ण शरीरात व्याप्त झालं. साई अमृत माझ्या रक्तात आणि आत्म्यामध्ये भिनलंय. प्रत्येक क्षणी त्याच्या प्रेमामृताने भरून वाहणारे माझे विचार हा प्रेमकुंभ (माझं शरीर ) भरतात.
           आपली आख्यायिका सांगते की, देव आणि दानवांनी क्षीरसागराचं मंथन केलं तेव्हा अमृत कुंभ प्रगटला. अमृतासाठी देव आणि दानव भांडू लागले. तेव्हा महाविष्णूंनी अत्यंत मोहक असा मोहिनी अवतार धारण केला आणि फक्त देवांना अमृत दिले. ह्याप्रमाणे साईरुपी अमृत कुंभामधील दिव्य प्रेमामृत अखिल जगतास देण्याचे कार्य माझ्यावर सोपविले गेले आहे. परंतु हे अमृत सर्वांना दिले जाईल. ह्या जगातील प्रत्येकाला अमर करणे, हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे. हे माझे जन्म रहस्य आहे. स्वामी आणि मी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत. साई महाविष्णूंनी स्वतः हा वसंतमोहिनी अवतार धारण केलाय आणि तेच जगातील सर्वांना अमरत्व बहाल करणार आहेत. 
- श्री वसंतसाई अम्मा 
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

संदर्भ - श्री वसंतसाई लिखित साहित्यातून   
   

जय साईराम 

शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" सत्य मनाला निर्मल बनवते. सत्य वचन ही अंतर्शुद्धी आहे. " 
विशेष कृपा 

तारीख १ जुलै २००८, सकाळचे ध्यान 

वसंता - स्वामी, 'स्पंद' विषयी थोडेसे सांगा नं. 
स्वामी - परमेश्वर हा कृपेचे मूर्तिमंत स्वरूप आहे. दयेपोटी तो अवतरित होतो, साक्षी म्हणून वावरतो. तो कुणाच्याही कर्मात हस्तक्षेप करीत नाही. क्वचित कधीतरी तो एखाद्या व्यक्तीवर विशेष कृपा करतो. त्यावेळी त्या व्यक्तीची सर्व कर्म नाहीशी होतात. यालाच म्हणतात 'स्पंद ' विशेष कृपा. 
वसंता - स्वामी, ही स्पंदशक्तीच परमेश्वराच लक्ष एखाद्या जीवाकडे वळवते का ? 
स्वामी - हो. स्पंदशक्ती कार्यान्वित झाल्यावर परमेश्वर एखाद्याचा कर्मसंहार करतो. हे अतिशय दुर्मिळ आहे. विशेष कृपा तुझं रूप घेऊन अवतरित झाली. ही अनुकंपाच युगपरिवर्तनाचं कारण आहे. 
वसंता - स्वामी, सीता आणि राधा पण अशाच होत्या का ? त्यासुद्धा स्पंदशक्ती होत्या...
स्वामी - होय. सीतेची भूमिका खूप छोटी होती. राधेची थोडी मोठी, आता तुझी भूमिका त्या दोघींपेक्षा खूप मोठी आहे. तू तुझ्या तपश्चर्येने आणि अश्रुंनी युगपरिवर्तन करायला आली आहेस. तू दयेपोटी इथे आलीस. 
ध्यानाची समाप्ती  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, १७ ऑक्टोबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " जेथे जेथे आपली दृष्टी जाते तेथे आपले मन जाते आणि इच्छांचा उदय होतो. "

 

मन आणि विषय 


            मी ' डेंटल ' शब्द ऐकल्यावर काय केले ?

            प्रथम मी म्हणाले," डेंटिस्टचे वडीलही डेंटिस्ट आहेत. " मी नेहमी विषयाचा उगमाशी संबंध जोडते, असेच यातून दिसते. 

            ही मूल भावना आहे. मी एखादा शब्द ऐकला की तो उगमाला जाऊन भिडतो. मी म्हणाले , डेंटिस्टचे वडीलही डेंटिस्ट आहेत. मुलाचे मूळ हे वडील आहेत. हा वंश आहे. 

            माझ मन एखादा शब्द ऐकल्याक्षणी त्या शब्दाचा उगम शोधत. परमेश्वर सर्वांच मूळ उगमस्थान आहे. म्हणूनच जेव्हा मी ' ट्रान्सेंडेंटल ' शब्द ऐकला, मी म्हणाले, "ट्रान्स ...,ओह ,जसे ट्रान्समायग्रेशन. मी सर्वांमध्ये परकायाप्रवेश करेन. " नंतर विचार केला, 'अवघ्या सृष्टीत मी परकाया प्रवेश करेन. सर्वांमध्ये केवळ माझे भाव असतील ... सर्वत्र केवळ परमेश्वर.'  ​


संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा  

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 

जय साईराम

गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " जर आपण मनाची परमेश्वराशी गाठ बांधली तर ते नियंत्रणात येईल आणि फलस्वरूप विश्वातील कोणतीही गोष्ट आपल्याला स्पर्श करणार नाही."

मन आणि विषय 

            'डेंटल ' या एका शब्दाने बत्तीस विचार जोडले जाऊन एक लांबच लांब शृंखला बनते. एक शब्द इतके विचार कसे काय निर्माण करू शकतो ? सकाळपासून रात्रीपर्यंत आपण किती बोल्ट असतो? किती गोष्टी पाहतो ? किती वाचतो ? किती विचार येतात ? अशाप्रकारे रोज किती विचार एकमेकांशी जोडले जातात ?

            दिवसभरात किती निरनिराळे विचार मनात आले याचा हिशोब केलात तर ते एक लाखाहून जास्त असतील !

            हे विचारांच गाठोड म्हणजेच मन. हे विचार शारीरिक जाणीवेतून निर्माण होत असतात. एका दिवसात एक शब्द एक लाख विषय गोळा करतो. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम