रविवार, २९ जानेवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " जर तुम्ही सर्वांवर भरभरून प्रेम केलेत तर तेच प्रेम  तुमच्याकडे येईल. "

प्रकरण सहा 

मंत्र 

राधा - कृष्ण प्रेमाचे सामर्थ्य 
१४ सप्टेंबर २००८
वसंता : स्वामी, प्लिज मला मंत्राविषयी काही सांगा ना !
स्वामी : हा मंत्र म्हणजे राधाकृष्ण मंत्र, शिवशक्ती मंत्र, पुरुष प्रकृती मंत्र आणि सृष्टी मंत्र आहे. तेथे केवळ ' ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः ' हा एकच मंत्र असेल. तेथे ना राधाकृष्ण मंत्र असेल ना प्रेमाराजा मंत्र. तुझे अश्रू आणि तुझी तळमळ ह्यातून या मंत्राची निर्मिती झाली आहे. केवळ नवनिर्मिती करण्यासाठी आपण येथे अवतरलो आहोत. 
ध्यान समाप्ती.  
                राधा कृष्णाचे प्रेम हाच या नवनिर्मितीचा पाया आहे. राधेच्या कृष्णाप्रति असणाऱ्या प्रेमाचा देहभावाशी संबंध नाही. ते एकत्वाचे तत्व आहे. राधेला वाटे, " कृष्ण जिथे जिथे असेल तिथे त्याच्याशी एकरूप व्हावे." राधेची ही उत्कट इच्छा बाह्यरूपात व्यक्त न झाल्यामुळे ती भावनिक स्तरावरच राहिली. हे माझ्या स्वामींप्रति असणाऱ्या प्रेमाचे स्वरूप आहे. मी म्हणते," मला स्वामी हवेत, स्वामी हवेत." अखिल निर्मितीत अस्तित्वात असलेल्या स्वामींच्या स्थूल रूपाशी एक होण्याची मला तृष्णा आहे. सृष्टी म्हणजे स्वामीच !
                लहानपणी मला कृष्णाशी लग्न करायचे होते. ह्या इच्छेने वैश्विक रूप धारण केले आणि सत्ययुगाची निर्मिती झाली. ह्यातूनच नवनिर्मितीसाठी पुरुष - प्रकृती तत्व बनले. येथे सत्य आणि प्रेम प्रत्येकामध्ये आणि प्रत्येक गोष्टीत प्रवेश करेल. हे वसंतमयम आहे. हा या मंत्राचा पाया आहे आणि म्हणून स्वामींनी याला ' सत्ययुगाचा मंत्र ' असे संबोधले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम
 

गुरुवार, २६ जानेवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" प्रेमाविना जीवन म्हणजे मृत्युच."

प्रकरण सहा 

मंत्र 

                परमेश्वर हा वेद उपनिषदे आणि ब्रम्हसूत्र यांचा मूलस्त्रोत आहे. त्यांच्यापासून सर्वांची निर्मिती झाली आहे. सर्वांचा केंद्रबिंदू असलेल्या त्यालाच मी घट्ट पकडून ठेवले आहे. त्यामुळे आपोआपच प्रत्येक गोष्ट माझ्याकडे येते. मी परमेश्वराकडे एकाग्रतेने वाटचाल करत असल्यामुळे ग्रंथ हेच माझा मार्ग बनले. मी मार्गही पाहिला नाही आणि जगाकडेही बघितले नाही ; कारण माझी दृष्टी केवळ माझ्या ध्येयावर, म्हणजेच परमेश्वरावर स्थिर होती. सर्वांचा केंद्रबिंदू असणाऱ्या परमेश्वराला आपण धरून ठेवले पाहिजे. एवढेच पुरेसे आहे. वेद आणि उपनिषदांचा अभ्यास करण्याची काही आवश्यकता नाही. ते आपोआपच आपला स्थायीभाव बनून जातील. हे माझ्या जीवनाच्या उदाहरणाद्वारे  दाखवण्यात आले आहे. उच्च साधनेतून जीवात्मा परमात्मा बनतो. तिचे ( जीवाचे )अनुभव, तिचे भाव, तिचे विचार हेच वेद, उपनिषदे आणि ब्रम्हसूत्र बनून जातात. 
               ह्या अवस्थेत माझे सर्व विचार केवळ वैश्विक मुक्ती आणि स्वामींशी होणारा माझा सदेह योग ह्या दोनच विषयांवर केंद्रित आहेत. केवळ या दोन्हींनीच माझे मन व्यापून टाकले आहे.
               नुकतेच एका व्यक्तीने मला म्हटले," तुम्ही तुमच्या मनाला वाटेल ते लिहा ; परंतु त्याचा स्वामींशी संबंध जोडू नका,"
               स्वामींशिवाय मी कसे काय लिहू शकेन ? खरं तर स्वामींच हे सर्व लिहीत आहेत. माझ्या प्रत्येक वाक्यात स्वामी आहेत. तुम्हाला कोणी श्वास घेऊ नका असे सांगितले तर ते शक्य आहे का ? स्वामी माझा श्वास आहेत. अंतिम श्वास घेतल्यानंतरच माझे स्वामींविषयीचे विचार थांबतील.
               

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, २२ जानेवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी तुम्ही काही केले नाही तरी हरकत नाही परंतु त्यांच्या आनंदावर विरजण घालू नका."

प्रकरण सहा 


मंत्र 

               हे सत्य माझे भाव, प्राणशक्ती, हृदय आणि देह घुसळून काढते आहे. हे सत्यसाई तत्व माझ्याशी एकरूप झाले आहे. म्हणून मला ही एकच गोष्ट माहीत आहे. ' मला ते हवे आहेत, मला ते हवे आहेत ' ही माझी एकमेव तृष्णा आहे. त्याद्वारे मी वेद, उपनिषदे आणि गीता यांचे मार्ग अनुसरत आहे, असे स्वामी सिद्ध करत आहेत. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " तुमची दैनंदिन कर्म, परमेश्वराला समर्पित केल्याच्या भावनेतून करून पवित्र बनवा."

प्रकरण सहा 

मंत्र 

                 २००४ मध्ये ' उपनिषदांच्या पलीकडे ' लिहित असताना मी स्वतःला संपूर्णपणे रिक्त करून स्वामींना  सर्व काही अर्पण केले  त्यानंतर त्यांनी परमेश्वराचे सत्य माझ्यामध्ये भरले. मी कोणत्या अवस्थेत आहे याविषयीची जाणीव नसलेल्या स्थितीत मी आहे ही स्थिती म्हणजे ' मी ' विना ' मी '. 
                 मी एक सर्वसामान्य खेडूत स्त्री आहे जिला बाहेरच्या जगाविषयी काहीही माहिती नाही. मी केवळ एकच गोष्ट केली ती म्हणजे परमेश्वरासाठी अश्रू ढाळणे. जर मी त्याला प्राप्त करू शकले नाही तर माझा हा जन्म व्यर्थ आहे. ' मला स्वामी हवेत, मला स्वामी हवेत. असे म्हणून मी नेहमीच रडत असते, आक्रोश करत असते. मला दुसरे काहीही नको.'
                माझ्या जन्मापासून मला परमेश्वराच्या दर्शनाची तृष्णा आहे; ही तृष्णा माझ्या हृदयाच्या गाभ्यापासून निर्माण झाली आहे. मला सत्याची प्राप्ती झाली आहे, तथापि मला हे माहिती नाही. यालाच म्हणतात, ' मी ' विना ' मी ' स्थिती. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, १५ जानेवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

          " इंद्रियांकडे धाव घेणाऱ्या मनाला वैराग्याद्वारे दुसरीकडे वाळवा. ही इंद्रिये शाश्वत आनंदाचे शत्रू आहेत." 
प्रकरण सहा

मंत्र 

               वैश्विक मुक्तीसाठी मी सतत विलाप करत होते. पुस्तकरूपातून मी माझे भाव व्यक्त केले आहेत. स्वामींनी मला उपनिषदांच्या पलीकडे, ब्रम्हसूत्र, प्रेमसूत्र आणि आनंदसूत्र लिहिण्यास सांगितले. ही  पुस्तके लिहीत असताना माझ्या असे लक्षात आले की माझ्यामध्ये निर्माण होणाऱ्या भावकल्लोळामधून स्वामी साधकास प्राप्त होणाऱ्या विविध अवस्था दाखवत होते. त्यांनी प्रत्येक स्थिती दाखवून सांगितले, " हे भाव आणि गुण वेदांसाठी समर्पक आहेत, तसेच ते भाव आणि ते गुण गीतेसाठी समर्पक आहेत." स्वामी मला सर्व सांगतात आणि मी लिहिते. अशा पद्धतीनेच मी ' उपनिषदांच्या पलीकडे ' आणि इतर सर्व पुस्तके लिहिली. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम




गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी तुम्ही काही केले नाही तरी हरकत नाही परंतु त्यांच्या आनंदावर विरजण घालू नका."

प्रकरण सहा 

मंत्र 

                पुन्हा एकदा स्वामींनी मला लिहिण्यास सांगितले. ह्यावेळेस विषय होता ' उपनिषदे '. मी लिहिण्यास सुरुवात केली आणि लवकरच असे लक्षात आले की माझे जीवन ह्या ग्रंथांमधील तत्वज्ञानाचे निदर्शक आहे. मी १० उपनिषदे लिहिली. त्यामध्ये उपनिषदांमधील उच्च ज्ञान विशद करण्यासाठी मी माझे भावविश्व आणि स्वभाव यांची उदाहरणे दिली. अनेक जण वेद आणि उपनिषदे आणि इतर ग्रंथ वाचतात आणि त्यानंतर त्यातील तत्वज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आधी ज्ञान आणि नंतर आचरण माझे जीवन याच्या उलट आहे. आधी आचरण, ज्ञानप्राप्ती आणि मग अनुभवाचे बोल. माझी जीवनशैली वेद आणि उपनिषदांची तत्वे आचरणात कशी आणायची, याचे निदर्शन करते. 
                त्यानंतर स्वामींनी मला ' उपनिषदांच्या पलीकडे ' लिहिण्यास सांगितले. मुक्ती निलयममध्ये राहायला आल्यानंतर मी या पुस्तकाचे लिखाण केले. हे पुस्तक पूर्णपणे माझ्या मनातील भाव आणि विचार यावर आधारित आहे. सूक्ष्मदेह आणि कारणदेह यापासून अलग झालेल्या आत्म्यामध्येच असे भाव, विचार निर्माण होतात, असे स्वामींनी सांगितले. जो ईश्वराशी तादात्म्य पावतो त्याचे स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह विभक्त होऊन तो शुद्धसत्व अवस्थेत जगू लागतो. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, ८ जानेवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

             " तुमच्या प्रेमाने, परमेश्वराला तुमच्याशी बोलण्यास भाग पाडले पाहिजे." 
 
प्रकरण सहा 

मंत्र 

                   स्वामींनी मला माझे काही अनुभव लिहिण्यास सांगितले. त्या अनुभवांचेच इथेच, याक्षणी, मुक्ती या मालिकेतील भाग -३ हे पुस्तक मूर्तरूपात आले. लिहित असताना त्यांनी, माझ्या संपूर्ण जीवनाची वाटचाल वेदांच्या मार्गावरून झाली हे दर्शविण्यासाठी वेदांमधील काही उदाहरणे दिली. त्यांनी मला ते पुस्तक तीन भागात लिहिण्यास सांगितले. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. माझे सर्व अनुभव, भाव आणि विचार हे वेदच असल्याचे स्वामींनी मला स्पष्ट करून सांगितले. मला वेद माहित नाहीत. मी ते वाचलेही नाहीत. परंतु स्वामी म्हणाले, की मी माझ्या संपूर्ण जीवनाची वाटचाल वेदांमध्ये सांगितलेल्या मार्गावरूनच केली आहे. 
                 पुढे स्वामींनी मला भगवद्गीतेवर पुस्तक लिहिण्यास सांगितले आणि माझ्या अनुभवांच्या सहाय्याने त्यातील श्लोकांचे स्पष्टीकरण करण्यास सांगितले. लिहित असताना माझ्या असे लक्षात आले की गीतेमध्ये दिलेल्या मार्गाचे मी तंतोतंत अनुसरण केले आहे. मी नकळत माझे जीवन, गीता आणि वेद ह्यांनी आखून दिलेल्या मार्गावरून व्यतीत केले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम